Friday, September 10, 2010

परमेश्वरावर श्रद्धा असावी काय?

ख्रिश्चन धर्मातील कोर्स ऑफ मिराक्ल्स मध्ये एक वाक्य आहे "जर तुम्ही निवडलेल्या मार्गावर तुम्ही चालत असताना तुमच्या सोबत कोण चालत आहे हे तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला आयुष्यात कोणत्याच गोष्टीची भीती वाटणार नाही". देव आहे कि नाही आपणाला माहित नाही परन्तू कोणी तरी सर्व शक्तिमान माझ्या सोबत आहे असा विश्वास आपल्याला अनेक संकटांशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य देतो. हा विश्वास, योग्य निर्णय घेण्याची क्षमता व आत्मविश्वास यांच्या सहाय्याने आपण यशस्वी होतो. कोर्स ऑफ मिराक्ल्स मधील हे वाक्य दैववादी नाही हे लक्षात घ्या कारण त्यात तुम्ही निवडलेल्या मार्गावर तुम्ही चालत असताना असे म्हटले आहे म्हणजे मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहे. कोणी तरी सर्व शक्तिमान माझ्या सोबत आहे असा विश्वास आपल्याला कसा उपयोगी ठरतो ते पुढील काही कथांच्या सहाय्याने आपल्याला लक्षात येईल.
पहिली गोष्ट. एकदा एक माणूस वाळवंटातून एकटाच चालला होता. त्याच्या लक्षात आले कि त्याच्या पावलांच्या बाजूला अजून दुसऱ्या पावलांच्या खुणा होत्या. त्याने भीतीने विचारले "कोण आहे?". उत्तर मिळाले "अरे मी परमेश्वर, मी सदैव तुझ्या बरोबरच आहे". तेवढ्यात त्या वाळवंटात एक वादळ आले. चालणे सुद्धा कठीण झाले. आता त्या माणसाच्या लक्षात आले कि आता वाळूत एकाच व्यक्तीच्या पाऊलखुणा आहेत. वादळ थांबले परत वाळूत दोन व्यक्तीच्या पाऊलखुणा दिसू लागल्या. तेव्हा तो माणूस म्हणाला "अरे परमेश्वरा जेव्हा तुझी मला संकटात आवश्यकता होती तेव्हा तू माझ्याबरोबर नव्हतास". परमेश्वर म्हणाला "अरे मी तुझ्या बरोबरच होतो". तो माणूस म्हणाला "अरे वाळूत केवळ माझ्याच पाऊलखुणा होत्या". त्यावर परमेश्वर म्हणाला "अरे त्या पाऊलखुणा तुझ्या नाही माझ्या होत्या. मी तुला वादळात उचलून घेतले होते". परमेश्वर सतत आपल्या सोबत असतो यावर माझा विश्वास आहे. तेव्हा मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. अनेकदा नेहमीच्या आयुष्यातील बदलांना आपण संकट समजतो. हा बदल नियती आपल्या प्रगतीसाठी आणत असते पण आपण हे संकट समजतो. प्रत्येक संकटात (Problem) त्याची उकलही (Solution) सामावलेली असते व ती ओळखता आली पाहिजे.
दुसरी गोष्ट एका जंगलातील आहे. एका जंगलात तीन झाडे होती. त्या तीन झाडामधील हा संवाद आहे. पाहिले झाड म्हणाले "बघा माझा बुंधा किती तरी सुंदर आहे. त्यापासून कोणीतरी एक सुंदर पाळणा बनवेल व जगाचा राजकुमार त्या पाळण्यात शांत निद्रा घेईल". दुसरे झाड म्हणाले "माझा बुंधा पसरट व उंच आहे यापासून सुंदर फळ्या बनविता येतील व या फळ्यापासून सुंदर जहाज बनेल व जगाचा राजपुत्र या जहाजात बसून जलविहार करेल". तिसरे झाड म्हणाले "माझा बुंधा खूप उंचच उंच आहे मी आणखी उंच होईन एके दिवशी आकाशातील परमेश्वर माझ्या बरोबर असेल". बरेच दिवस गेले एक लाकुडतोड्या त्या जंगलात आला त्याने ती तीन झाडे तोडली व त्यांचे मोठे ओंडके आपल्या घरी घेऊन गेला. पहिल्या झाडाच्या बुन्ध्याचे त्याने तुकडे केले व त्यांच्या त्याने घोड्यांचे खाणे ठेवण्यासाठी गव्हाणी केल्या. दुसऱ्या झाडाच्या बुंध्याच्या छोट्या फळ्या कापून त्यांची छोटी होडकी तयार केली. तिसऱ्या झाडाच्या त्याने लांब फळ्या कापून नंतर कधी तरी वापरता येतील म्हणून बाजूला ठेवल्या.
एक दिवस त्या घोड्याच्या तबेल्यात एक जोडपे आले. त्या स्त्रीने एका सुंदर बालकाला जन्म त्या तबेल्यात दिला. त्या बालकाला कोठे ठेवायचे म्हणून त्या माणसाने तेथील एक गव्हाणी उचलली (हि गव्हाणी त्या लाकूडतोडयाने पहिल्या झाडापासून बनविलेली होती) त्यात थोडे गवत टाकले व त्या बालकाला आत ठेवले. ते बालक त्या गव्हाणीत शांतपणे झोपी गेले.
हेच बालक पुढे मोठे झाले त्याने नवीन धार्मिक कल्पना मांडल्या जुन्या कल्पनांना विरोध केला. त्यामुळे त्याला बराच विरोध झाला त्याला तेथून निघून जावे लागले व त्या साठी त्या राज्यातील हद्द पार करताना त्याला नदी पार करावी लागली व नदी पार करताना त्याने छोट्या होडक्याचा (हे होडके त्या लाकूडतोडयाने दुसऱ्या झाडापासून बनविले होते) वापर केला. त्याला नंतर पकडण्यात आले व धर्माच्या विरोधात बोलणारयाना जरब बसावी म्हणून त्याला उंच जागी टांगून त्याच्या अंगावर खिळे ठोकण्याची शिक्षा देण्यात आली. त्यासाठी तिसऱ्या झाडाच्या फळ्या वापरून क्रॉस बनविण्यात आला व त्याचा वापर करून या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली.
हे बालक म्हणजे येशू ख्रिस्त. आकाशातल्या बापाचा पुत्र म्हणजे जगाचा राजकुमारच. म्हणजे या तिन्ही झाडांच्या इच्छा पूर्ण झाल्या. पहिल्या झाडापासून तयार झालेल्या गव्हाणीत जगाचा राजकुमार झोपला. दुसऱ्या झाडापासून तयार झालेल्या होडक्यातून जगाच्या राजकुमाराने प्रवास केला. तर तिसऱ्या झाडाच्या इच्छेनुसार प्रत्यक्ष परमेश्वर त्याच्या बरोबर होता. हे श्रद्धा व विश्वास याचे उत्तम उदाहरण आहे.
तिसरी गोष्ट आहे एका देवावारती प्रचंड श्रद्धा असणाऱ्या माणसाची. एका गावातील माणसाची देवावारती प्रचंड श्रद्धा होती. कुठल्याही कठीण प्रसंगात देव आपल्याला मदत करेल याची त्याला खात्री होती. एकदा त्या गावात पूर आला. गावात पाणी शिरले. तो माणूस निर्धास्त होता. एक गावकरी त्याच्याकडे आला व म्हणाला "अरे गावात पाणी भरत आहे चल माझ्याबरोबर". तो माणूस म्हणाला "मला भीती नाही, परमेश्वर मला वाचवेल". आता पाणी कमरेपर्यंत वाढले होते. एक होडीवाला त्याच्याकडे आला म्हणाला "बस या होडीत". तो माणूस म्हणाला "मला भीती नाही, परमेश्वर मला वाचवेल". आता पाणी घराच्या छतापर्यंत पोचले. तो माणूस घराच्या छतावर चढला. तेवढ्यात एक helicopter आले त्यातल्या चालकाने एक दोर खाली टाकला व त्या माणसाला तो दोर पकडण्यासाठी सांगितले. पण त्या माणसाने नकार दिला व म्हणाला "मला भीती नाही, परमेश्वर मला वाचवेल". पुढे पाणी वाढून तो माणूस बुडून मेला. स्वर्गात गेल्यावर त्याने देवाला विचारले "अरे तुझ्यावर माझी श्रद्धा आहे तरी तू मला वाचविले नाहीस". देव म्हणाला अरे "मी तुला वाचविण्याचा प्रयत्न तीनवेळा केला पण तू त्याला योग्य प्रतिसाद दिला नाहीस. त्यामुळे जे झाले त्याला तूच जबाबदार आहेस". या गोष्टीवरून आपण हे समजणे आवश्यक आहे कि श्रद्धेचा अतिरेक असू नये. परमेश्वर योग्य संधी देतच असतो आपण त्या संधींना ओळखून योग्य फायदा करून घेतला पाहिजे.
आता एक विनोदी गोष्ट. एक दिवस एक माणूस चर्चच्या छताचे दुरुस्तीचे काम करत होता. तोल जाऊन तो खाली पडला त्याला काहीही झाले नाही . चर्चचे फादर त्याच्या जवळ आले व म्हणाले "वाचलास कारण परमेश्वर तुझ्याबरोबर होता". तेव्हा तो माणूस म्हणाला "कोणीतरी असलाच पाहिजे ज्याने धक्का देऊन मला पाडले"

श्रद्धा अंधश्रद्धा होणार नाही याची काळजी घ्या. परमेश्वरावर श्रद्धा ठेऊन आपण जगत असलो तरी मार्ग आपल्याला निवडायचा आहे, निर्णय आपल्याला घ्यायचा आहे हे विसरू नका. मार्ग निवडणे व निर्णय घेणे हे परमेश्वराचे काम नाही हे लक्षात ठेवा.

Tuesday, August 31, 2010

एखादी चूक अनावधानाने घडली तर काय?

हि कथा रशियातील बर्फाळ प्रदेश सैबेरिया या भागातील आहे. तो वर्षातील सर्वात थंड दिवस होता. तसे वर्षभर हा प्रदेश पूर्ण बर्फाच्छादित असतो पण त्या दिवशी खूपच थंडी होती. एक छोटा पक्षी एका खडकाच्या कपारीत थंडीने अर्धमेल्या अवस्थेत पडला होता. बरेच दिवस त्याला काही खायला मिळाले नव्हते. आज पाणी पण प्यायला मिळाले नव्हते. त्याची मृत्यूची वेळ जवळ आली होती. त्याचे प्राण न्यायला यमदूतही आले पण कोण जाणे ते त्या पक्षाचे प्राण नेत नव्हते. तेथून जाणाऱ्या एका गरुडाने ते पाहिले. त्याने विचार केला मी तर पक्षांचा राजा आणि बलवान आहे. या पक्षाचा जीव वाचविणे माझे कर्तव्य आहे. तो त्या पक्षाच्या समोर बसला. कसेबसे त्या मृतप्राय पक्षाला त्याने आपल्या पाठीवर बसविले. तेथून उडून गरुड एका उबदार प्रदेशात घेऊन आला. त्याने त्या पक्षाला एका मऊ जागी उतरवले. जवळून काही किडे मारून त्या पक्षाला खायला दिले. पक्षी ते खाऊन तरतरीत झाला त्याला ताकद आली. तो आता उडू शकत होता.
तेवढ्यात यमदूत परत त्या ठिकाणी आले व त्या पक्षाचे प्राण घेउन निघाले. पक्षी आता मेला होता. हे पाहून गरुडाला राग आला त्याने यमदूताना विचारले "अरे जेव्हा त्या थंड प्रदेशात हा अर्धमेला होता तेव्हा तुम्ही त्याचे प्राण नेले नाहीत पण आता तो पक्षी बरा झाल्यानंतर तुम्ही त्याला मारता हे योग्य नाही अरे मारायचे होते तर त्या थंड प्रदेशातच मारायचे होते". त्यावर यमदूत म्हणाले "अरे याचे मरण या उबदार प्रदेशातच होणार होते व तो पूर्ण बरा असतानाच व या क्षणालाच होणार होते. तू त्याला या प्रदेशात आणलेस व त्याला खायला दिलेस त्याला पूर्ण बरे केलेस. आणि या पक्षाचे मरण ठरल्या प्रमाणे झाले".
आता गरुड रडू लागला व म्हणाला "हे मी काय केले. मी त्या पक्षाच्या मरणाला कारणीभूत झालो". त्यावर यमदूत म्हणाले "तू शोक करू नकोस तू फक्त कारण झालास हे होणारच होते. तू नाही तरी अजून कोणीतरी हे करणारच होते हे ऐकून गरुड़ शांत झाला
त्यामुळे आयुष्यात अनावधानाने काही कृती आपल्याकडून घडून दुसऱ्याचे काही नुकसान झाल्यास आपण फक्त कारण असतो तर ते त्या व्यक्तीचे भाग्याविधान असते. यामुळे या घटनेबद्दल आयुष्यभर आपण अपराधीपणाची भावना ठेवणे चुकीची आहे. हि भावना फक्त त्या क्षणापुरती ठीक आहे पण तिच्यापासून लवकरात लवकर मुक्त होणे आवश्यक आहे. परंतु एखादी कृती आपण मुद्दामहून व जाणतेपणे करत असू तर ते आपले कर्म होते व प्रत्येक क्रियेला तितकीच तीव्र प्रतिक्रिया असते हे विचारात घेतले तर या कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात. त्या मुळे कोणतीही कृती जाणतेपणी करताना त्या सर्व परिणामाचा विचार करा. बऱ्याचदा आतला आवाज (Sub Conscious Mind ) हा आपल्याला योग्य मार्ग दाखवितो. काही वेळा अशा घटना आपल्याला व त्या व्यक्तीला त्याच्या कर्मातून मुक्त होण्यासाठी घडतात. कर्माचा सिद्धांत आपण पुढे पाहणारच आहोत.

Thursday, August 26, 2010

आपले जीवन नशिबावर अवलंबून असते का?

या अगोदरच्या ब्लॉग मध्ये अन्न साखळी या घटकात येणाऱ्या संकटांची चिंता न करण्याचा मी सल्ला दिला होता. तसेच जे होऊन गेले त्याचा विचार करू नये असे सांगितले होते. आता जीवन नशिबावर अवलंबून असते का? हा प्रश्न. या साठी आपण एक कथा पाहूया.
आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे बालकाच्या जन्मापासून सहाव्या दिवशी सटवी नावाची देवी येते व त्या बालकाचे भविष्य लिहिते. लोकसंख्या वाढल्या कारणाने या देवीचे काम खूपच वाढले. शेवटी एकदा ती कंटाळून ब्रह्मदेव (Generator) , विष्णू (Organiser) व शंकर (Destroyer) या त्रिदेवांकडे गेली व आपल्या होणाऱ्या त्रासाबद्दल व धावपळीबद्दल सांगितले. या वर त्रिदेवांनि तिला सांगितले कि त्या बालकाची फक्त जन्म वेळ व मृत्यू वेळ लिही मधले आयुष्य कसे जगायचे, कोणते अनुभव घ्यायचे, हे ते बालक स्वतः ठरवेल. म्हणून आताच्या काळात आपण आपले भविष्य ठरवू शकतो.
जे तुमच्या आयुष्यात झाले ते १०० % घडणारच होते. पुरावा हवा? पहा ते तुमच्या आयुष्यात घडलेच. या मागचा विनोद सोडून द्या. माझे अध्यात्मिक गुरु श्री नौशीर इंजिनीअर म्हणतात कि आपल्या आयुष्यातील ८० % हे विधिलिखित असते व २० % आपल्याला निवडण्याचे स्वातंत्र्य (Free Choice or Free Will) असते. सकारात्मक विचार असणारी माणसे या २० % निवड स्वातंत्र्याचा उपयोग इतक्या खुबीने करतात कि उरलेले ८० % आयुष्य ते यशस्वीरीत्या जगतात. इथे लक्षात घेणे महत्वाचे आहे कि त्यांच्या ८० % आयुष्यात जे घडणार होते तेच घडते पण ते निवड स्वातंत्र्याचा उपयोग यशस्वीपणे करतात व या सर्व प्रसंगातून योग्य मार्ग काढतात व त्या प्रसंगांचा आपला भौतिक व अध्यात्मिक विकास करण्याकरिता करतात. मग या २० % निवड स्वातंत्र्यात काय येते. सर्वात प्रथम कोणत्याही प्रसंगाला योग्य भावनिक प्रतिसाद (Emotional Response) द्या. कोणताही टोकाचा भावनिक प्रतिसाद प्रतिसाद देऊ नका. जसे अति आनंद अति दुख, अति राग इ. तोंडातून येणारा प्रत्येक शब्द सांभाळून वापरा. लोकसंग्रह वाढवा. ज्ञान वाढवा. कोणत्यातरी कलेमध्ये अथवा कामात असे कौशल्य प्राप्त करा कि त्यात तुमचा हात या क्षेत्रात कोणीही धरू शकणार नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील सर्व तसेच आधुनिक ज्ञान मिळवा. लक्षात घ्या या गोष्टी तुम्ही निवडू शकता व यांचा उपयोग तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी करता येईल. व स्वतःचे ८० % भविष्य लिहिता येईल.

Tuesday, August 24, 2010

मना सज्जना - 001

लहानपणा पासून माणसाच्या सवयी बद्दल आपण अनेक म्हणी ऐकल्या जशा "जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही", "सुंभ जळाला तरी पीळ जात नाही", "कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच", "साखरेत घोळले तुपात तळले तरी कारले कडूच", "कावळा काळा व बगळा पांढरा". थोडक्यात या म्हणीचा अर्थ कि माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही. याच तत्वानुसार समाज त्या माणसाचे मूल्यमापन करतो व या माणसाचा स्वभाव कधीच बदलणार नाही असे म्हणतो. पण मग या म्हणींच काय? "प्रयत्नांती परमेश्वर", "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे", "इच्छा असेल तर मार्ग दिसेल", म्हणजे समाज हे ही मानतो कि प्रयत्नपूर्वक कोणतीही गोष्ट शक्य आहे. मग माणसाच्या सवयी बद्दल असलेल्या म्हणी या चुकीच्या ठरतात. म्हणजे एखाद्याने प्रयत्न केल्यास त्याच्या सवयी व स्वभाव बदलता येतात. मी अनेक व्यक्तिमत्व विकासाच्या अभ्यास क्रमात भाग घेतला पथिक सारख्या प्रशिक्षण कार्यक्रमात गौरव पुरस्कार देखील मिळवला. न्युरो लिन्गुइस्टिक प्रोग्रम्मिंगचा, अल्ट्रा माइण्डचा अभ्यास केला. हे सर्व अभ्यासक्रम करताना माझ्या बरोबर अनेकजण होते. हा अभ्यासक्रम सुरु असताना सर्व सहभागी सकारात्मक विचारांनी व उर्जेने ओतप्रोत भरलेले असायचे, हा प्रशिक्षण कार्यक्रम संपल्यानंतर व्यवहारात हि सर्व तत्व वापरून यशस्वी होणारच असा प्रत्येकाचा विश्वास होता. पण या पैकी किती जण खरच यशस्वी झाले? बऱ्याचदा असे दिसून येते कि प्रशिक्षण कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण जवळ जवळ एक महिन्यापर्यंत भारलेले असतात. नंतर पुन्हा हरिदासाची कथा मूळ पदावर येते व हे सर्व जण पुन्हा इतर सामान्यजनाप्रमाणे जगायला लागतात. असे काय होते कि प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शूर असलेले वीर प्रत्यक्षात हार मानतात. अनेक वर्ष शेक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात काम केल्यानंतर अनेक प्रकारचे विद्यार्थी व व्यक्ती भेटल्या. त्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. या विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले त्यांची उत्तरे देताना मलाही आयुष्य जगण्याची काही तत्वे सापडली. खर तर आजच्या विद्यार्थ्यांकडून बरेच तसेच आधुनिक ज्ञान मिळते. हि माहिती सर्वाना उपलब्ध व्हावी असे वाटले म्हणून हा ब्लॉग लिहिण्याचा अट्टाहास.
व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमात मनाच्या वाढीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. व्यक्तीचा मूळ स्वभाव बदलला जात नाही. या संदर्भात एका झेन कथेची आठवण होते. एकदा जपानमधील एका विद्यापीठाचे प्राध्यापक झेन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी नान इन नावाच्या प्रसिद्ध झेन गुरुंकडे गेले. त्या प्राध्यापकांनी आपल्या शैक्षणिक ज्ञानाबद्दल गुरूंना माहिती दिली. आपल्या ज्ञानाच्या व्याप्तीची कल्पना दिली. परंतु झेन पद्धतीबद्दल काही माहित नसल्याचे सांगितले. गुरूंनी शांतपणे प्राध्यापकाचे बोलणे ऐकले व त्यांना चहा पिण्याची विनंती केली. स्वतः गुरु कपमध्ये चहा ओतू लागले. प्राध्यापकांचा कप पूर्ण भरला तरी गुरु चहा ओतत होते. चहा खाली सांडू लागला. आता प्राध्यापकांनी गुरूंना जाणीव करून देत म्हटले "कप पूर्ण भरला आहे त्यात अजून चहा राहू शकत नाही". यावर गुरूंनी उत्तर दिले "या कपाप्रमाणे तुमचे मन हे तुमची स्वतःची मते व विचार यांनी भरले आहे. जो पर्यंत तुम्ही तुमच्या मनाचा कप रिकामा करत नाही तोपर्यंत तुमच्या मनात नवीन ज्ञान (झेन) जाणार नाही. तुम्ही फक्त ज्ञान मिळवलं त्याचा व्यवहारात उपयोग होणार नाही कारण ते या चहा प्रमाणे वाहूनच जाणार.
कोणत्याही व्यक्तिमत्व विकास अथवा अध्यात्मिक विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी आपल्या मनाचा कप आपल्याला अगोदर रिकामा करायचा आहे.