Tuesday, August 31, 2010

एखादी चूक अनावधानाने घडली तर काय?

हि कथा रशियातील बर्फाळ प्रदेश सैबेरिया या भागातील आहे. तो वर्षातील सर्वात थंड दिवस होता. तसे वर्षभर हा प्रदेश पूर्ण बर्फाच्छादित असतो पण त्या दिवशी खूपच थंडी होती. एक छोटा पक्षी एका खडकाच्या कपारीत थंडीने अर्धमेल्या अवस्थेत पडला होता. बरेच दिवस त्याला काही खायला मिळाले नव्हते. आज पाणी पण प्यायला मिळाले नव्हते. त्याची मृत्यूची वेळ जवळ आली होती. त्याचे प्राण न्यायला यमदूतही आले पण कोण जाणे ते त्या पक्षाचे प्राण नेत नव्हते. तेथून जाणाऱ्या एका गरुडाने ते पाहिले. त्याने विचार केला मी तर पक्षांचा राजा आणि बलवान आहे. या पक्षाचा जीव वाचविणे माझे कर्तव्य आहे. तो त्या पक्षाच्या समोर बसला. कसेबसे त्या मृतप्राय पक्षाला त्याने आपल्या पाठीवर बसविले. तेथून उडून गरुड एका उबदार प्रदेशात घेऊन आला. त्याने त्या पक्षाला एका मऊ जागी उतरवले. जवळून काही किडे मारून त्या पक्षाला खायला दिले. पक्षी ते खाऊन तरतरीत झाला त्याला ताकद आली. तो आता उडू शकत होता.
तेवढ्यात यमदूत परत त्या ठिकाणी आले व त्या पक्षाचे प्राण घेउन निघाले. पक्षी आता मेला होता. हे पाहून गरुडाला राग आला त्याने यमदूताना विचारले "अरे जेव्हा त्या थंड प्रदेशात हा अर्धमेला होता तेव्हा तुम्ही त्याचे प्राण नेले नाहीत पण आता तो पक्षी बरा झाल्यानंतर तुम्ही त्याला मारता हे योग्य नाही अरे मारायचे होते तर त्या थंड प्रदेशातच मारायचे होते". त्यावर यमदूत म्हणाले "अरे याचे मरण या उबदार प्रदेशातच होणार होते व तो पूर्ण बरा असतानाच व या क्षणालाच होणार होते. तू त्याला या प्रदेशात आणलेस व त्याला खायला दिलेस त्याला पूर्ण बरे केलेस. आणि या पक्षाचे मरण ठरल्या प्रमाणे झाले".
आता गरुड रडू लागला व म्हणाला "हे मी काय केले. मी त्या पक्षाच्या मरणाला कारणीभूत झालो". त्यावर यमदूत म्हणाले "तू शोक करू नकोस तू फक्त कारण झालास हे होणारच होते. तू नाही तरी अजून कोणीतरी हे करणारच होते हे ऐकून गरुड़ शांत झाला
त्यामुळे आयुष्यात अनावधानाने काही कृती आपल्याकडून घडून दुसऱ्याचे काही नुकसान झाल्यास आपण फक्त कारण असतो तर ते त्या व्यक्तीचे भाग्याविधान असते. यामुळे या घटनेबद्दल आयुष्यभर आपण अपराधीपणाची भावना ठेवणे चुकीची आहे. हि भावना फक्त त्या क्षणापुरती ठीक आहे पण तिच्यापासून लवकरात लवकर मुक्त होणे आवश्यक आहे. परंतु एखादी कृती आपण मुद्दामहून व जाणतेपणे करत असू तर ते आपले कर्म होते व प्रत्येक क्रियेला तितकीच तीव्र प्रतिक्रिया असते हे विचारात घेतले तर या कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात. त्या मुळे कोणतीही कृती जाणतेपणी करताना त्या सर्व परिणामाचा विचार करा. बऱ्याचदा आतला आवाज (Sub Conscious Mind ) हा आपल्याला योग्य मार्ग दाखवितो. काही वेळा अशा घटना आपल्याला व त्या व्यक्तीला त्याच्या कर्मातून मुक्त होण्यासाठी घडतात. कर्माचा सिद्धांत आपण पुढे पाहणारच आहोत.

Thursday, August 26, 2010

आपले जीवन नशिबावर अवलंबून असते का?

या अगोदरच्या ब्लॉग मध्ये अन्न साखळी या घटकात येणाऱ्या संकटांची चिंता न करण्याचा मी सल्ला दिला होता. तसेच जे होऊन गेले त्याचा विचार करू नये असे सांगितले होते. आता जीवन नशिबावर अवलंबून असते का? हा प्रश्न. या साठी आपण एक कथा पाहूया.
आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे बालकाच्या जन्मापासून सहाव्या दिवशी सटवी नावाची देवी येते व त्या बालकाचे भविष्य लिहिते. लोकसंख्या वाढल्या कारणाने या देवीचे काम खूपच वाढले. शेवटी एकदा ती कंटाळून ब्रह्मदेव (Generator) , विष्णू (Organiser) व शंकर (Destroyer) या त्रिदेवांकडे गेली व आपल्या होणाऱ्या त्रासाबद्दल व धावपळीबद्दल सांगितले. या वर त्रिदेवांनि तिला सांगितले कि त्या बालकाची फक्त जन्म वेळ व मृत्यू वेळ लिही मधले आयुष्य कसे जगायचे, कोणते अनुभव घ्यायचे, हे ते बालक स्वतः ठरवेल. म्हणून आताच्या काळात आपण आपले भविष्य ठरवू शकतो.
जे तुमच्या आयुष्यात झाले ते १०० % घडणारच होते. पुरावा हवा? पहा ते तुमच्या आयुष्यात घडलेच. या मागचा विनोद सोडून द्या. माझे अध्यात्मिक गुरु श्री नौशीर इंजिनीअर म्हणतात कि आपल्या आयुष्यातील ८० % हे विधिलिखित असते व २० % आपल्याला निवडण्याचे स्वातंत्र्य (Free Choice or Free Will) असते. सकारात्मक विचार असणारी माणसे या २० % निवड स्वातंत्र्याचा उपयोग इतक्या खुबीने करतात कि उरलेले ८० % आयुष्य ते यशस्वीरीत्या जगतात. इथे लक्षात घेणे महत्वाचे आहे कि त्यांच्या ८० % आयुष्यात जे घडणार होते तेच घडते पण ते निवड स्वातंत्र्याचा उपयोग यशस्वीपणे करतात व या सर्व प्रसंगातून योग्य मार्ग काढतात व त्या प्रसंगांचा आपला भौतिक व अध्यात्मिक विकास करण्याकरिता करतात. मग या २० % निवड स्वातंत्र्यात काय येते. सर्वात प्रथम कोणत्याही प्रसंगाला योग्य भावनिक प्रतिसाद (Emotional Response) द्या. कोणताही टोकाचा भावनिक प्रतिसाद प्रतिसाद देऊ नका. जसे अति आनंद अति दुख, अति राग इ. तोंडातून येणारा प्रत्येक शब्द सांभाळून वापरा. लोकसंग्रह वाढवा. ज्ञान वाढवा. कोणत्यातरी कलेमध्ये अथवा कामात असे कौशल्य प्राप्त करा कि त्यात तुमचा हात या क्षेत्रात कोणीही धरू शकणार नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील सर्व तसेच आधुनिक ज्ञान मिळवा. लक्षात घ्या या गोष्टी तुम्ही निवडू शकता व यांचा उपयोग तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी करता येईल. व स्वतःचे ८० % भविष्य लिहिता येईल.

Tuesday, August 24, 2010

मना सज्जना - 001

लहानपणा पासून माणसाच्या सवयी बद्दल आपण अनेक म्हणी ऐकल्या जशा "जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही", "सुंभ जळाला तरी पीळ जात नाही", "कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच", "साखरेत घोळले तुपात तळले तरी कारले कडूच", "कावळा काळा व बगळा पांढरा". थोडक्यात या म्हणीचा अर्थ कि माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही. याच तत्वानुसार समाज त्या माणसाचे मूल्यमापन करतो व या माणसाचा स्वभाव कधीच बदलणार नाही असे म्हणतो. पण मग या म्हणींच काय? "प्रयत्नांती परमेश्वर", "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे", "इच्छा असेल तर मार्ग दिसेल", म्हणजे समाज हे ही मानतो कि प्रयत्नपूर्वक कोणतीही गोष्ट शक्य आहे. मग माणसाच्या सवयी बद्दल असलेल्या म्हणी या चुकीच्या ठरतात. म्हणजे एखाद्याने प्रयत्न केल्यास त्याच्या सवयी व स्वभाव बदलता येतात. मी अनेक व्यक्तिमत्व विकासाच्या अभ्यास क्रमात भाग घेतला पथिक सारख्या प्रशिक्षण कार्यक्रमात गौरव पुरस्कार देखील मिळवला. न्युरो लिन्गुइस्टिक प्रोग्रम्मिंगचा, अल्ट्रा माइण्डचा अभ्यास केला. हे सर्व अभ्यासक्रम करताना माझ्या बरोबर अनेकजण होते. हा अभ्यासक्रम सुरु असताना सर्व सहभागी सकारात्मक विचारांनी व उर्जेने ओतप्रोत भरलेले असायचे, हा प्रशिक्षण कार्यक्रम संपल्यानंतर व्यवहारात हि सर्व तत्व वापरून यशस्वी होणारच असा प्रत्येकाचा विश्वास होता. पण या पैकी किती जण खरच यशस्वी झाले? बऱ्याचदा असे दिसून येते कि प्रशिक्षण कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण जवळ जवळ एक महिन्यापर्यंत भारलेले असतात. नंतर पुन्हा हरिदासाची कथा मूळ पदावर येते व हे सर्व जण पुन्हा इतर सामान्यजनाप्रमाणे जगायला लागतात. असे काय होते कि प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शूर असलेले वीर प्रत्यक्षात हार मानतात. अनेक वर्ष शेक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात काम केल्यानंतर अनेक प्रकारचे विद्यार्थी व व्यक्ती भेटल्या. त्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. या विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले त्यांची उत्तरे देताना मलाही आयुष्य जगण्याची काही तत्वे सापडली. खर तर आजच्या विद्यार्थ्यांकडून बरेच तसेच आधुनिक ज्ञान मिळते. हि माहिती सर्वाना उपलब्ध व्हावी असे वाटले म्हणून हा ब्लॉग लिहिण्याचा अट्टाहास.
व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमात मनाच्या वाढीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. व्यक्तीचा मूळ स्वभाव बदलला जात नाही. या संदर्भात एका झेन कथेची आठवण होते. एकदा जपानमधील एका विद्यापीठाचे प्राध्यापक झेन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी नान इन नावाच्या प्रसिद्ध झेन गुरुंकडे गेले. त्या प्राध्यापकांनी आपल्या शैक्षणिक ज्ञानाबद्दल गुरूंना माहिती दिली. आपल्या ज्ञानाच्या व्याप्तीची कल्पना दिली. परंतु झेन पद्धतीबद्दल काही माहित नसल्याचे सांगितले. गुरूंनी शांतपणे प्राध्यापकाचे बोलणे ऐकले व त्यांना चहा पिण्याची विनंती केली. स्वतः गुरु कपमध्ये चहा ओतू लागले. प्राध्यापकांचा कप पूर्ण भरला तरी गुरु चहा ओतत होते. चहा खाली सांडू लागला. आता प्राध्यापकांनी गुरूंना जाणीव करून देत म्हटले "कप पूर्ण भरला आहे त्यात अजून चहा राहू शकत नाही". यावर गुरूंनी उत्तर दिले "या कपाप्रमाणे तुमचे मन हे तुमची स्वतःची मते व विचार यांनी भरले आहे. जो पर्यंत तुम्ही तुमच्या मनाचा कप रिकामा करत नाही तोपर्यंत तुमच्या मनात नवीन ज्ञान (झेन) जाणार नाही. तुम्ही फक्त ज्ञान मिळवलं त्याचा व्यवहारात उपयोग होणार नाही कारण ते या चहा प्रमाणे वाहूनच जाणार.
कोणत्याही व्यक्तिमत्व विकास अथवा अध्यात्मिक विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी आपल्या मनाचा कप आपल्याला अगोदर रिकामा करायचा आहे.